किंमत परिणाम म्हणजे काय?www.marathimahiti.com

किंमत परिणाम म्हणजे काय?

कोठल्याही क्षणास उपलब्ध वस्तूंच्या मानाने चलनपुरवठा वाढला, तर वस्तूंच्या किंमती वाढतील, चलनपुरवठा कमी झाला तर किंमती उतरतील. पहिल्या प्रकारास 'चलनवाढ' म्हणतात व दुसऱ्यास 'चलनघट' असे संबोधतात. या दोहोंचे अर्थव्यवस्थेवर फार महत्त्वाचे व दूरगामी परिणाम होतात.

किंमतीचे प्रकार

किंमती निरनिराळ्या स्वरूपात आढळतात. जागेचा किंवा घराचा वापर करण्यासाठी द्यावी लागणारी किंमत म्हणजेच खंड अथवा भाडे. श्रमाच्या किंमतीस वेतन, पगार किंवा मोबदला म्हणतात. भांडवलाची किंमत म्हणजे त्यासाठी द्यावे लागणारे व्याज. वाहतुकीसाठी द्याव्या लागणाऱ्या किंमतीस भाडे किंवा आकारणी म्हणतात. दलालाच्या कामाची किंमत ती दलाली. अभिकर्त्याच्या (एजंट) कामाची किंमत म्हणजे त्याचे कमिशन. परकीय चलनाची किंमत चलनबाजारातील व्यवहारांच्या दरांनी दर्शविली जाते. किरकोळ व्यवहारांच्या बाजारात ‘घाऊक किंमती’ आढळतात. रोखीचे व्यवहार चालणाऱ्या बाजारातील किंमतीस ‘रोख किंमत’ ही संज्ञा आहे, तर वायदेबाजारातील किंमतीस ‘वायदे किंमत’ म्हणतात. बाजारावर नियंत्रण असल्यास तेथील व्यवहार नियंत्रीत किंमतीत व्हावेत अशी अपेक्षा असते; परंतु ते व्यवहार जर नियंत्रणाचे उल्लंघन करून नियंत्रित किंमतीपेक्षा जास्त दराने झाले, तर त्यासाठी काळ्या बाजारातील किंमत द्यावी लागली, असे म्हणतात. अंतर्गत व्यापारातील किंमतीस ‘अंतर्गत किंमत’ म्हणतात, परंतु परराष्ट्रीय व्यापारातील किंमतींना ‘आंतरराष्ट्रीय किंमत’ म्हणतात. आयात वस्तूंच्या किंमतीस ‘आयात किंमत’ व निर्यात वस्तूंच्या किंमतीस ‘निर्यात किंमत’ असे संबोधतात.

किंमतींचे महत्त्व

अर्थव्यवस्था सुरळीच चालावयाची, तर किंमतींकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. उपभोक्ते व उत्पादक यांचे निर्णय किंमती विचारात घेऊनच केले जातात. किंमतींवर अनेकांचे उत्पन्न अवलंबून असते. सरकारला किंमतींविषयी योग्य धोरण आखावे लागते आणि ते कार्यवाहीत आणावे लागते. बॅंका, व्यापारी, धनको, ऋणको, बचत करणारे आणि खर्च करणारे या सर्वांच्या दृष्टीने किंमती फार महत्त्वाच्या आहेत. अर्थव्यवस्थेतील बहुतेक व्यवहार किंमतीवर नजर ठेवून होत असतात; म्हणूनच किंमत ही अर्थशास्त्रातील एक केंद्रीभूत संकल्पना आहे. तिला अर्थशास्त्राची ‘रडार’ असेही म्हटले जाते.

किंमत कशी ठरते ?

पूर्ण स्पर्धा

पूर्ण स्पर्धा, पूर्ण मक्तेदारी व अपूर्ण स्पर्धा किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा या तीन भिन्न अवस्थांमध्ये भिन्न प्रकारे किंमत ठरते. पूर्ण स्पर्धेच्या अवस्थेत म्हणजेच मुक्त बाजारात किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या परस्पर प्रतिक्रियेने ठरते. पुरवठा न बदलता मागणी वाढली की किंमत वाढते, मागणी कमी झाली तर किंमत घसरते. त्याचप्रमाणे मागणी कायम असता पुरवठा कमी झाला तर किंमत वाढते, पुरवठा वाढला तर किंमत कमी होते. किंमतींमधील हे चढउतार कितपत होतील, हे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत तिच्या मागणीच्या आणि पुरवठ्याच्या लवचिकतेवर अवलंबून असते. किंमतींतील चढउतारांवरून मागणी-पुरवठ्यात बदल करणे जरूर आहे की नाही, याची कल्पना उत्पादन संस्थांना किंमतीवरून येते. उपलब्ध पुरवठ्याची मागणीकारांमध्ये योग्य विभागणी किंमतींमुळे शक्य होते; म्हणूनच किंमती मागणी व पुरवठा यांच्यातील समतोल साधतात. यासाठी मुक्त बाजाराची मात्र आवश्यकता असते. त्याच्या संबंधित यंत्रणेस परवाना पद्धतीचा किंवा वाटपपद्धतीचा उपयोग करावा लागेल मूल्यनिर्धारण सिद्धांत.

मक्तेदारी

या पद्धतीत मक्तेदारास संबंधित वस्तूची किंवा सेवेची किंमत आपल्या फायद्याच्या दृष्टीने निश्चित करता येते; परंतु त्या किंमतीस किती पुरवठा खपेल, हे ठरविणे त्याच्या हाती नसते. याउलट किती माल खपवावयाचा हे त्याने निश्चित केले, तर त्या मालाची किंमत मागणीवर अवलंबून असल्याने ती त्याला ठरविता येणार नाही. म्हणजे किंमत किंवा एकूण विक्री यांपैकी कोणती तरी एकच बाब तो ठरवू शकतो. मक्तेदारास जास्तीत जास्त नफा मिळवावयाचा असल्यास त्याने आपले सीमांत उत्पन्न हे सीमांत व्ययाबरोबर होईल, अशा रीतीने किंमत किंवा विक्रय यांचे प्रमाण ठरविले पाहिजे मक्तेदारी; मूल्यनिर्धारण सिद्धांत.

मक्तेदारीयुक्त स्पर्धा :

प्रत्यक्षात व्यवहारात पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण मक्तेदारी क्वचितच आढळते. कारण प्रत्यक्षात सर्वच वस्तू आणि सेवा उपभोक्यांच्या गरजा भागविण्यासाठी एकमेकांशी कमीजास्त प्रमाणात स्पर्धा करीत असतात. त्यामुळे मक्तेदारीपेक्षा मक्तेदारीयुक्त स्पर्धा विशेषत्वाने आढळते. या अवस्थेत निरनिराळ्या उत्पादनसंस्थांच्या पर्यायी वस्तूंची पर्यायक्षमता परिपूर्ण स्वरूपाची नसते; म्हणून प्रत्येक उत्पादक मूल्यभेदनाच्या आधारे निरनिराळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारू शकतो व स्वत:साठी जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. प्रत्येक उत्पादक आपले सीमांत व्ययाइतके ठेवण्याचा प्रयत्न करतो मूल्यनिर्धारण सिद्धांत; मूल्यभेदन.

किंमत यंत्रणेचे स्वरूप :

इतरांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा त्यांना व आपल्याला संमत होतील अशा किंमतींना विकत घेऊन त्यांच्यापासून होणारे उत्पादन ग्राहकांना व आपल्याला मान्य होईल, अशा किंमतीला विकता यावे या हेतूने एकूण अर्थव्यवस्थेच्या उत्पादनास कितपत हातभार लावावयाचा, याचा निर्णय प्रत्येक उत्पादनसंस्थेस घ्यावा लागतो. असे निर्णय अर्थव्यवस्थेतील ज्या यंत्रणेमुळे उत्पादनसंस्थांना घेता येणे शक्य होते, त्या यंत्रणेस ‘ किंमत यंत्रणा’ असे म्हणतात. वस्तू व सेवा यांच्या किंमती जरी बाजारात मागणी व पुरवठा या तत्त्वानुसार ठरत असल्या, तरी त्या सर्व किंमती अगदी स्वतंत्र अशा नसतात. उलट, निरनिराळ्या किंमती एकमेकींवर अवलंबून असतात; त्यांचा एकमेकींशी अगदी निकटचा संबंध असतो. एका किंमतीत फरक झाला, तर त्याचा दुसरीवर परिणाम होतो. दुसरी बदलली, की तिच्याशी निगडीत असलेल्या आणखी इतर किंमतीही बदलतात. याचा अर्थ किंमतींची यंत्रणा संवेदनाक्षम असते. ती सदव आपले कार्य करीत असते. अतिपरिचयामुळे तिचे महत्त्व व कार्यक्षमता आपण विचारात घेत नाही. ती गृहीत धरूनच व्यक्ती व उत्पादनसंस्था आपापले आर्थिक निर्णय घेत असतात. अशा असंख्य व अनेकविध निर्णयांची नोंद घेऊन किंमत यंत्रणा इतर निर्णयांसाठी आवश्यक असलेली माहिती पुरविण्यास सदैव सज्ज असते. या तिच्या कार्यक्षमतेच्या मुळाशी काही गृहीततत्त्वे आहेत. त्यांच्या आधारेच ती सुरळीत चालते. प्रत्येक व्यक्तीस व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य असणे, वेतनासाठी काम करण्याची तिची तयारी असणे, खाजगी मालमत्तेचे तत्त्व संमत असणे, तीबद्दल करार करण्यास कायदेशीर मुभा असणे इ. चिरपरिचित तत्त्वे गृहीत धरल्यासच किंमत यंत्रणा यशस्वी होते.

कार्य

किंमत यंत्रणेचे परिपूर्ण आकलन होणे कठीण असले, तरी तिची महत्त्वाची कामगिरी सांगता येते. एकतर ही यंत्रणा लोकांना श्रम करण्यास उद्युक्त करण्याचे कठीण व नावडते काम अंगीकारते. आळशीपणा आवडत नसल्यामुळे लोक कामे करण्यास तयार असतात खरे; परंतु कोणत्या कामधंद्यात किंवा व्यवसारंत शिरून उत्पन्न मिळवावयाचे, हा निर्णय ते किंमत यंत्रणेद्वारा घेऊ शकतात. तिच्यायोगे प्रत्येक कार्यक्षेत्रात आवश्यक त्या प्रमाणात श्रमपुरवठा होऊ शकतो. किंमत यंत्रणेच्या अभावी ही श्रमविभागणी एखाद्या मध्यवर्ती यंत्रणेच्या किंवा सरकारच्या हुकुमानुसार करावी लागत असती. असे हुकूम शिस्तीमुळे किंवा राष्ट्रप्रेमामुळे पाळले गेले, तरी ते अनेक वेळा दु:सह वाटतात. विशेषत: लोकशाहीत त्यांना महत्त्वाचे स्थान असू शकत नाही. किंमत यंत्रणेचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे उपभोक्त्यांना आपल्या गरजांचे योग्य नियमन करावयास लावण्याचे. असे नियमन अन्य मार्गांनी हुकूमशाहीला साधता येथे खरे; परंतु त्या मार्गांनी उपभोक्त्यांचे पूर्ण समाधान होतेच, असे म्हणता येत नाही. वस्तू व सेवा यांच्या किंमती पाहूनच उपभोक्ते आपल्या उपभोगाचे मान निश्चित करतात व आपल्या मर्यादित उत्पन्नापासून जास्तीत जास्त समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतात. किंमत यंत्रणेचे तिसरे व सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे कोट्यवधी व्यक्ती व संख्या यांच्या आर्थिक निर्णयाचा समन्वय साधण्याचे. यासाठी असंख्य प्रकारच्या वस्तू व सेवा यांच्या उपलब्धतेविषयी विविध माहिती सूत्रबद्ध करून ती बिनचूकपणे सतत जगभर पुरवावी लागते आणि तिच्या सहाय्याने सर्वांना आर्थिक व्यवहार करण्यास उद्युक्त करावे लागते. दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेल्या तांत्रिक प्रगतीमुळे माहितीप्रवाहाचा वेग जरी वाढला असला, तरी किंमत यंत्रणेद्वारा बरीचशी माहिती थोडक्या शब्दांत व आकड्यांत सामावून घेता येऊ लागल्याने आर्थिक व्यवहार सुकर होतात. उदा., साखर बाजारातील ‘डी ३० – ५८६’ ही किंमत म्हणजे साखरेच्या प्रमाणीत प्रतींपैकी ‘डी ३०’ या प्रतीच्या १०० किलोंची किंमत बाजारात ५८६ रु. आहे एवढ्या माहितीची सूत्ररूपाने मांडणी. अशा रीतीने व्यवहारात आवश्यक असलेली बरीचशी माहिती किंमत यंत्रणेमुळे अत्यल्प शब्दांत व्यक्त करता येते व त्यामुळे त्या माहितीचा प्रसार सोईस्कर रीत्या व कमी खर्चात करणे शक्य होऊन आर्थिक उलाढालींचे निर्णय झटपट घेतले जाण्यास मदत होते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 16:20 ( 3 years ago) 5 Answer 4462 +22