Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
‘क्रांति’ या शब्दाचा रूढ असलेला अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिक वापरला जातो. या संदर्भात सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शासनपद्धतीत केलेल मौलिक परिवर्तन, असा त्याचा अर्थ होतो. व्यापक सामाजिक संदर्भात म्हणजे अर्थव्यवस्था, संस्कृती, वैज्ञानिक वा इतर सामाजिक संस्था किंवा परिस्थिती यांमध्ये मौलिक परिवर्तन घडून होणारा विकास, असा या शब्दाचा अर्थ होतो. मानवी प्रयत्नाच्या कोणत्याही क्षेत्रातील विकासाभिमुख परिवर्तन यात अभिप्रेत असते. अमेरिकन आणि फ्रेंच या राजक्रांत्यांच्या घडामोडींनंतर ‘जुने मोडणे व नवे घडविणे’, हा अर्थ त्यात अधिक स्पष्ट झाला. जुने हक्क वा जुन्या चांगल्या परंपरा पुनरुज्जीवित करण्याचीही कल्पना अमेरिकन व फ्रेंच राज्याक्रांतीच्या नेत्यांच्या मनात होती. त्याचप्रमाणे ब्रिटनमधील नागरिक अनुभवत असलेले स्वतंत्र व राजकीय हक्क आपणास पूर्णपणे प्राप्त व्हावे, आपणास कायदेमंडळावर वा संसदेवर प्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळावा, अशी आकांक्षा उत्तर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींत आलेल्या नागरिकांमध्ये निर्माण झाली आणि त्याकरिता ब्रिटिश वसाहतवाल्यांनी ब्रिटनशी युद्धास प्रारंभ केला. परंतु अखेर अपेक्षेपेक्षा निराळेच घडले, अमेरिकन राष्ट्र स्वतंत्र झाले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या नेत्यांनासुद्धा रोमन साम्राज्यातील नागरिकांचे राजकीय स्वातंत्र्य हे ध्येयही आकर्षक वाटत होते परंतु या दोन्ही क्रांत्यांमध्ये प्रत्यक्ष मागणी व घोषणा, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मानवी हक्कांचीच होती.
आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक किंवा सामाजिक क्रांतीमध्ये सशस्त्र बंडाची किंवा उठावाची म्हणजे हिसेंची बहुधा आवश्यकताच नसते राजकीय क्रांतीच्या घडामोडीतच हिंसा आवश्यक म्हणून निर्माण होते. क्रांतीची पूर्वतयारी म्हणजे प्रगती, स्वातंत्र्य व सामाजिक न्याय यांची नेत्यांच्या व जनतेच्या मनात उत्पन्न झालेली तीव्र जाणीव आणि त्याचप्रमाणे जुलूम, भ्रष्टाचार, जीर्ण झालेली सामाजिक व राजकीय चौकट यांच्याविरुद्ध प्रखर असंतोष होय. या पूर्वतयारीनंतरच नेते क्रांतीचा उठाव करू लागतात.
क्रांती व प्रतिक्रांती अशा दोन सापेक्ष संज्ञा राजकीय इतिहासात रूढ झाल्या आहेत. त्यांचा पहिला साधा अर्थ असा की, विशेष राजकीय परिवर्तन झाल्यानंतर नवी राजवट अस्तित्वात येते व नवे सत्ताधारी सत्तारूढ होतात. पुन्हा काही सामाजिक शक्ती उठाव करून ती राजवट त्या सत्ताधाऱ्यांसह उलथून टाकतात आणि त्या शक्तींचे प्रतिनिधी आपली राजवट स्थापन करतात ह्यास प्रतिक्रांती म्हणतात. परंतु केवळ नवी राजवट स्थापन करणे व जुनी उलथून टाकणे म्हणजे क्रांती नव्हे, किंवा नवी राजवट स्थिरावल्यानंतर किंवा स्थिरावत असताना पुन्हा तिला जबरदस्त धक्का देऊन निराळी राजवट स्थापन करणे, म्हणजे प्रतिक्रांती नव्हे. क्रांतीच्या मुळाशी प्रेरक असलेल्या ध्येयवादात सर्व नागरिकांचे राजकीय स्वातंत्र्य हे अंतिम मूल्य म्हणून गृहीत धरलेले असते आणि त्या मूल्यानुसारे नवे राज्यसंविधान तयार होऊन ते संविधान, अर्थात राज्याचा मूलभूत कायदा कार्यवाहीत आणणारी राज्यसंस्था स्थापित होते आणि त्यानंतर जे वारंवार कायदे होतात ते मूलभूत स्वातंत्र्याला व इतर नागरिक हक्कांना जीवनात मूर्त स्वरूप देण्याकरिता तयार होत असतात. परंतु नंतर मूलभूत स्वातंत्र्य व नागरिक हक्क किंवा अन्य पुरोगामी जीवनमूल्ये अमान्य असलेल्या प्रतिगामी सामाजिक शक्तींचे प्रतिनिधी वरील प्रकारचे राज्यसंविधान व त्याच्यावर आधारलेली राज्यसंस्था व शासन उलथून पाडून त्यात अंतर्भूत असलेले स्वातंत्र्य व अन्य मूलभूत हक्क यांची गळचेपी करणारी राज्यसंस्था व शासन पुन्हा निर्माण करतात त्याला प्रतिक्रांती म्हणतात.
जुनी सामाजिक व राजकीय व्यवस्था संपूर्णपणे किंवा अंशतः मोडकळीस येते तेव्हा क्रांतीची परिस्थिती तयार होते. सत्ताधारी वर्गाची अकार्यक्षमता व दुर्बलता, आर्थिक पेचप्रसंग, युद्ध, जनतेचा कंगालपणा इ. गोष्टी सामाजिक व राजकीय दुरवस्थेस कारण होतात. जेव्हा दीर्घ काळ लाभलेल्या शांततेत सुस्त बनलेला सत्ताधारी वर्ग व समाजातील प्रतिष्ठित लोक आळशी, भ्रष्टाचारी आणि बदलत्या परिस्थितीचे आकलन न करता मूढ व आत्मसंतुष्ट बनतात, अंधश्रद्धेने परंपरेला चिकटून बसतात राज्याबाहेरच्या जगातील नव्या घटनांकडे दुर्लक्ष करतात जनतेच्या दुस्थितीकडे कानाडोळा करतात आणि न्याय्य तक्रारी करणाऱ्या बहुजनांना दडपून टाकतात तेव्हा सामाजिक व राजकीय स्थिती मोडकळीस आली, असे समजावे. मात्र ही मोडकळीस आलेली परिस्थितीच केवळ क्रांतीस कारण होऊ शकत नाही तीत अधिक कारणांची भर पडणे जरूर असते.
दुसरे असे की, सामाजिक दुरवस्थेची जाणीव असलेला आणि त्या जाणिवेमुळे वारंवार आर्थिक, सामाजिक सुधारणांची मागणी करणारा असा असंतुष्ट मोठा वर्ग, जनतेचा मोठा विभाग, अस्तित्वात यावा लागतो आणि असंतोषाचे निदर्शक असे उद्रेकही व्हावे लागतात.
राजकीय क्रांती ही बहुधा सशस्त्र उठाव वा युद्ध यांच्या ओघातच घडून येते. सशस्त्र उठावावाचून म्हणजे हिंसेवाचून राजकीय व तज्जन्य सामाजिक क्रांति घडू शकते, असा विचार क्रांतीचा सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८—८३) याला त्याच्या आयुष्याच्या शेवटी सुचला होता. तो लिहितो की, इंग्लंडमध्ये सशस्त्र उठावावाचून शांततामय उपायांनीच समाजवादाची स्थापना होऊ शकेल. निःशस्त्र क्रांतीचा पुरस्कार भारतीय स्वातंत्र्याचे नेते राष्ट्रपिता ⇨ महात्मा गांधी यांनी प्रामुख्याने मांडला आणि भारताचे स्वातंत्र्य वा लोकशाही संघराज्य हे एका अर्थी सत्याग्रहाच्या आंदोलनाने सशस्त्र युद्धावाचून निर्माण झाले. हे जरी खरे असले, तरी जगातील आजपर्यंतच्या राजकीय क्रांत्यांचा इतिहास हा मुख्यतः युद्ध आणि हिंसा यांनी भरलेला दिसतो. पुष्कळ वेळा प्रस्थापित राज्यसंस्थेतील सत्ताधारी हे क्रांतिकारक आंदोलनाला आळा घालण्याकरिता पोलीस व सैन्य यांचा वापर करतातच. त्यामुळे क्रांतिकारक आंदोलनाचे युद्धात रूपांतर होते. अमेरिकन क्रांति सफल होऊन शांतता प्रस्थापित होईपर्यंत ब्रिटनशी त्यांचा काही वर्षे संग्राम चालू होता. फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रारंभ १४ जुलै १७८९ मध्ये सुरू झाला आणि तीत क्रांती व प्रतिक्रांती यांची मालिका, ही तिसरे गणराज्य स्थापन होईपर्यंत चालू होती. तिसरी जगातील मोठी राज्यक्रांती रशियन राज्यक्रांति होय. ही बोल्शेव्हिक ऑक्टोबर क्रांती होय. ती रशियन कालगणनेप्रमाणे २५ ऑक्टोबर १९१७ मध्ये झाली. प्रस्थापित सत्ताधार्यांच्या हातातून सत्ता काबीज करणे, ही क्रांतीच्या यशाची पहिली पायरी होय आणि सत्ता काबीज करणाऱ्या वर्गाने वा पक्षाने संविधान निर्माण करून अथवा निर्माण न करता संविधान तयार करून राज्यसंस्था निर्माण करणे, ही क्रांतीच्या यशाची दुसरी पायरी होय. रशियन राज्यक्रांती ही सशस्त्र उठावाने झाली परंतु त्यात सत्ता काबीज करण्याच्या कालबिंदूपर्यंत रक्तपात फार थोडा करावा लागला.
लाल चीनची १९४९ साली झालेली चौथी मोठी राज्यक्रांती होय. या राज्यक्रांतीचा इतिहास, हा दुहेरी युद्धाचा म्हणजे प्रथम कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रीय पक्ष यांच्यातील यादवीचा व नंतर जपानी साम्राज्यशाही व चिनी राजकीय शक्ती यांच्यातील युद्धाचा इतिहास होय. हे दुहेरी युद्ध १९२७ ते १९४९ पर्यंत तीव्रपणे चालू होते. यात तीन बाजू युद्धमान दिसतात : एक, ⇨ चँग-कै-शेकची (१८८७—१९७५) राष्ट्रीय आघाडी, दुसरी जपानची आक्रमक आघाडी आणि तिसरी ⇨माओ त्से तुंगची कम्युनिस्ट पक्षाची आघाडी. राष्ट्रीय आघाडी आणि कम्युनिस्ट आघाडी यांच्यात अनेक तीव्र युद्धे झाली, त्याबरोबरच वारंवार शांततेचे तात्पुरते तहही झाले. हे शांततेचे तह जपानच्या साम्राज्यशाही आक्रमणाला एकजुटीने तोंड देण्याकरिता झाले. जगाच्या इतिहासात क्रांतीकरिता इतका दीर्घ काळ चाललेला सशस्त्र लढा दुसरा दिसत नाही.
आधुनिक क्रांतीचे युग अठराव्या शतकात अमेरिकन राज्यक्रांती व फ्रेंच राज्यक्रांती यांपासून सुरू झाले. या क्रांत्यांचा ध्येयवाद हा विश्वक्रांतीचा ध्येयवाद आहे. या ध्येयवादाने माणसात अदम्य आत्मविश्वास उत्पन्न केला. या ध्येयवादाची तीन तत्त्वज्ञाने उदयास आली ही विश्वमानवाची तत्त्वज्ञाने किंवा मानवतेची तत्त्वज्ञाने होत. मूलभूत मानवी हक्कांचे व लोकशाहीचे तत्त्वज्ञान ⇨ जॉन लॉक (१६३२—१७०४) आणिðझां झाक रूसो (१७१२—७८) या इंग्लिश व फ्रेंच तत्त्ववेत्त्यांनी प्रतिपादिले. दुसरे समाजवाद व साम्यवादाचे तत्त्वज्ञान अत्यंत प्रभावीपणे कार्ल मार्क्स याने आणि तात्विक ⇨अराज्यवादाचे तत्त्वज्ञान गॉडविन, ⇨प्येअर प्रूदाँ (१८०९-६५) व ⇨प्यॉटर क्रपॉटक्यिन (१८४२—१९२१) यांनी मांडले. प्रूदाँनेच प्रथम सतत क्रांतीचा सिद्धांत मांडला. या तिन्ही तत्त्वज्ञाज्ञांनी आधुनिक जग कमीजास्त प्रमाणात प्रभावित झाले आहे. ही तीनही तत्त्वज्ञाने समाज आणि मानव यांचा संबंध उलगडून सांगतात. सामाजिक घटनांचे कर्तृत्व हे मानवी कर्तृत्व आहे मनुष्य इतिहासाचा कर्ता आणि मानवी स्वातंत्र्य, हे मानवी कर्तृत्वाचे व विकासाचे प्रेरक मुख्य तत्त्व व अंतिम उद्दिष्ट आहे, असे ही तत्त्वज्ञाने सांगतात.