ग्रामीण समाज म्हणजे काय?www.marathimahiti.com

ग्रामीण समाज म्हणजे काय?

कुटुंब आणि सगेसोयरे यांचा गट हा या दृष्टीने अतिमहत्त्वाचा ठरतो. परंतु समुदाय हाच एक मोठा गट असतो. कारण त्याच्या मागे वर उल्लेखिलेली सर्वच कारणे असतात. ग्रामीण समुदाय हा या दृष्टीने एक मोठा परंतु नागरी समाजाच्या तुलनेने कितीतरी लहान असा प्राथमिक गट असतो.

खेडेगावाचे स्वरूप हे (१) भौगोलिक, प्रादेशिक किंवा परिस्थितिविज्ञानात्मक, (२) सामाजिक रूपरचनात्मक, (३) सामाजिक संस्थात्मक आणि (४) सांस्कृतिक असे चतुर्विध आहे.

खेडेगावाचे प्रादेशिक स्वरूप : खेड्यातील लोकांची घरे एकमेकांच्या अगदी निकट आहेत, की एकमेकांपासून अलग किंवा लांब आहेत, यांवरून हे स्वरूप ठरते. जगात दोन्ही प्रकारची गावे आढळतात. भोवताली शेतजमिनी पसरलेल्या आणि मध्ये दाटीवाटीने वसलेली घरे, हे खेडेगावाचे स्वरूप सर्वांच्या परिचयाचे आहे. प्रत्येकाचे घर जेव्हा स्वतःच्या शेतजमिनीने किंवा फळबागांनी वेढलेले असते, तेव्हा साहजिकच घराघरांमध्ये अंतर असणे अपरिहार्य ठरते. वस्तीचा तिसरा एक प्रकार डोंगराळ भागात किंवा शेतजमीन अपुरी वा कमी असल्यास दिसून येतो. डोंगराळ भागांत दऱ्याखोऱ्यांतून अगर माळरानावर शेतीकरिता सलग आणि मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध नसते. जी जमीन एकत्र उपलब्ध असते, ती सर्वसाधारणपणे दोन–चार कुटुंबाना पुरणारी असते. म्हणून अशा प्रदेशात दोन–चार कुटुंबांची घरेच एकत्र दिसतात. बहुतेक मैदानी प्रदेशात सर्वांची घरे एकत्रित वा केंद्रीकृत असलेली गावे अधिक दिसतात आणि नदीकाठी, नदीच्या मुखाजवळील प्रदेशात किंवा भातशेतीच्या प्रदेशात तुरळक वस्तीची गावे दिसतात. अमेरिकेत प्रथम वसाहतीस आलेल्या गोऱ्या लोकांची गावे ही या नियमाला अपवाद होत. लागवडीलायक जमीन मुबलक असल्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे घर हे त्याच्या मालकीच्या शेताच्या मध्यभागी होते. म्हणून घराभोवती प्रत्येकाची शेतजमीन पसरली असल्यामुळे त्यातून केंद्रीकृत गाव निर्माण होणे शक्यच नव्हते. त्याचप्रमाणे ब्रिटिश बेटांवरील सर्वच भागांत (इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड व आयर्लंड) अलग अलग पसरलेली वस्तीच प्रामुख्याने दिसून येते. इतर पाश्चिमात्य देशांत दोन्ही प्रकारांची गावे प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार दिसून येतात.

भारतात सपाट मैदानी प्रदेशात केंद्रीकृत गावेच दिसून येतात. याच गावांना भारतीय ग्रामीण जीवनाचे प्रातिनिधिक स्वरूप आलेले आहे. बहुसंख्य भारतीय गावे याच प्रकारची आहेत. परंतु हिमालयाच्या पायथ्याशी व अन्य डोंगराळ भागांत सलग लागवडीलायक जमीन कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे महसूलाच्या हिशेबाने एकाच गावाखाली येणाऱ्या लहान लहान अशा अनेक वस्त्या दिसतात. एकाच गावाखाली येणाऱ्या अशा वस्त्यांना महाराष्ट्रात वाड्या किंवा पाडे म्हणतात. डोंगराळ भागातील काही गावांच्या वीस ते पंचवीसपर्यंतही वाड्या आहेत. अशा वाड्या मैदानी भागातील गावांच्याही आहेत; परंतु आकाराने त्या डोंगराळ भागातील वाड्यांपेक्षा सरासरीने मोठ्या आहेत. गावातील प्रत्येक घर भातशेतीने अगर फळबागांनी वेढलेले असल्याने, दक्षिण बंगाल, दक्षिण पंजाब, कोकणपट्टी आणि मलबार प्रदेश या ठिकाणी अशी घरे अलग पडलेली गावे दिसून येतात. या भागांत रस्त्याचे दुतर्फा अशा घरांची रांगच दिसते आणि एक गाव कोठे संपते व दुसरे कोठे सुरू होते, हे सहसा कळत नाही.

ग्रामवस्तीचे हे भिन्न प्रकार मुख्यतः भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि शेतीविषयीची अर्थव्यवस्था यांवर अवलंबून आहेत, असे म्हटले जाते. भौगोलिक परिस्थितीत भूपृष्ठाची वर निर्देशिलेली वैशिष्ट्ये, जमिनीचे गुणदोष, पाण्याची सोय इ. बाबी येतात. जेथे नद्यांच्या महापुराचा धोका असेल, तेथे उंचवट्यावर सर्वांची घरे एकत्रित असलेली दिसतात. त्याचप्रमाणे लागवडीलायक अशी जमीन सलग असली, तरी केंद्रीकृत गावे अधिकतर दिसून येतात. पाण्याची पुरेशी सोय नसल्यास विहीर, तलाव, झरा इत्यादींच्या लगत सर्वांची घरे एकत्रित असणे अधिक फायदेशीर ठरते. परंतु वस्तीच्या स्वरूपाबाबत पाण्याची सोय ही तितकीशी निर्णायक ठरत नाही, असेही दिसून आले. सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात गावकऱ्यांच्या संरक्षणाची आवश्यकता आणि मालमत्तेची व्यवस्था ह्या प्रामुख्याने उल्लेखिल्या जातात. एकाच कुळीचे वा वंशाचे किंवा समान संस्कृतीचे लोक एकत्र येऊन राहतात, असे काहींचे म्हणणे आहे. या बाबतीत एकवाक्यता दिसून येत नाही. काही ठिकाणी भिन्नभिन्न वंशांचे लोकही एकत्र राहत आले आहेत. समान संस्कृती ही एकत्र राहण्याची व त्यायोगे येणाऱ्या अन्योन्य संबंधांची परिणती होऊ शकते. समान व्यवसायांच्या गरजाही समान असतात. त्यांत एकमेकांची मदत घेणे अपरिहार्य ठरते. मदतीची अन्य साधने उपलब्ध नसल्यास समान व्यवसायांतील लोकांनी एकत्र राहून आपल्या समस्या सोडविणे आवश्यक ठरते. शेतीव्यवसायात नांगराचा वापर सुरू झाल्यापासून एकमेकांच्या मदतीची आवश्यकता अधिक भासू लागली आणि त्यामुळे एकत्र राहणे अपरिहार्य ठरले, असे काहींचे म्हणणे आहे. वन्य जनावरांपासून किंवा उपद्रवकारक टोळ्यांपासून संरक्षण मिळावे आणि प्रसंग पडल्यास इतरांची मदत मिळावी, म्हणूनही केंद्रीकृत गाव हे आवश्यक ठरले असावे, असा काहींचा तर्क आहे. पंरतु सर्वच केंद्रीकृत गावे ही या उद्दिष्टाने अस्तित्वात आलेली नाहीत. लागवडीखाली आणलेल्या सर्व सलग जमिनीचा मालक एकच असला, तर तो आपल्या अनेक कुळांवर नियंत्रण ठेवणे सुलभ व्हावे, कोणीही आपल्या ताब्यातून फुटून जाऊ नये, म्हणून सर्वांची वस्ती एकत्रच असणे पसंत करतो, असे म्हटले जाते. परंतु काही ठिकाणी सर्व कुळे एकत्र आली तर आपली सत्ता कदाचित झुगारून देतील, या भीतीने कुळांना अलग अलग ठेवल्याची उदाहरणेही आहेत. अशारीतीने वरील एक किंवा अनेक कारणांमुळे केंद्रीकृत गावे अस्तित्वात आली असण्याची शक्यता आहे. त्यांच्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण अमुक अशा एकाच कारणाच्या आधारे करता येत नाही.

खेडेगावाचे सामाजिक रूपरचनात्मक स्वरूप : सामाजिक रूपरचनेत सामाजिक व्यवच्छेदन किंवा प्रभेदन (डिफरेन्शिएशन), स्तरीकरण (स्ट्रॅटिफिकेशन) आणि गतिशीलता (मोबिलिटी) हे विषय येतात आणि ते विशेषतः केंद्रीकृत ग्रामसमुदायाशी संबंधित आहेत. व्यवच्छेदन हे गावात जे अलग अलग गट निर्माण होतात व त्यांच्या सदस्यांमध्ये जो आपपरभाव अनेक सामाजिक संबंधांतून व्यक्त होतो, त्यांवरून दिसून येते. या सामाजिक गटांच्या प्रभेदनाच्या मुळाशी सर्वसामान्यपणे पुढील कारणे असतात : (१) रक्तसंबंध, वंशसंबंध किंवा समाईक पूर्वज यांत लोकांच्या समजुतीला महत्त्व असते. त्यातील खरेखोटेपणाला नाही. (२) विवाहसंबंध. (३) समान धर्म, श्रद्धा, कर्मकांड इत्यादी. (४) भाषा, बोली आणि लोकनीतीतील सधर्म्य. (५) जमिनीची समाईक मालकी आणि तिचा वापर. (६) प्रादेशिक सामीप्य किंवा एकमेकांच्या शेजारी राहणे. (७) सामाजिक हक्क-कर्तव्यांच्या व शासकीय व्यवस्थेच्या बाबतीतील समाईक जबाबदारी. (८) व्यावसायिक हितसंबंध. (९) अनेक प्रकारचे आर्थिक हितसंबंध. (१o) समाईक सत्तेखाली वावरणे. (११) एकाच धार्मिक, शासकीय, शैक्षणिक किंवा इतर सामाजिक संस्थांशी संलग्न असणे. (१२) समाईक संरक्षणाची यंत्रणा. (१३) समाजजीवनातील परस्पर साहाय्याचे सातत्य. (१४) जीवनाची सर्वसामान्य पद्धत, अनुभव आणि सामाजिक व्यवहार हे समान, समाईक किंवा एकत्रित असणे. या कारणांपैकी रक्तसंबंध, धर्म, विवाह, भाषा आणि जमिनीची समाईक मालकी यांमुळे निर्माण झालेले गट अधिक घनिष्ट संबंधांचे असतात. ग्रामीण समुदायात यांमुळे निर्माण झालेले छोटेमोठे गट असतात. कुटुंब आणि सगेसोयरे यांचा गट हा या दृष्टीने अतिमहत्त्वाचा ठरतो. परंतु समुदाय हाच एक मोठा गट असतो. कारण त्याच्या मागे वर उल्लेखिलेली सर्वच कारणे असतात. ग्रामीण समुदाय हा या दृष्टीने एक मोठा परंतु नागरी समाजाच्या तुलनेने कितीतरी लहान असा प्राथमिक गट असतो. नित्य-नैमित्तिक व्यवहारांतील अनेक अन्योन्य संबंधांच्या धाग्यांनी तसेच इतिहास, परंपरा व अनुभव यांच्या साधर्म्याने व समाईकतेने आणि शासकीय, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाच्या स्वयंपूर्णतेने समुदायाच्या सदस्यांमध्ये आपल्या समुदायाबद्दल आपुलकी निर्माण झालेली असते. कुटुंबात जन्मलेले मूल ज्याप्रमाणे कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्यातील परस्परसंबंध यांचे सातत्य गृहीत धरते; त्याप्रमाणे ग्रामीण समुदायाचा सदस्य हा त्यातील सामाजिक संबंध हे चिरंतन स्वरूपाचे आहेत, असे समजून वागतो. त्याला काही पर्याय असू शकेल, याची कल्पनादेखील त्याच्या मनाला शिवत नाही. म्हणून प्रचलित सामाजिक संबंध हे त्याच्या दृष्टीने अंतिम स्वरूपाचे बनतात. हे संबंध टिकविणे हेच त्याचे कार्य ठरते. सामाजिक संबंध हे त्याच्याकरिता साधन न बनता साध्य बनतात. वर उल्लेखिलेल्या कारणांमुळे जवळीक अधिक निर्माण झालेल्या व्यक्तींचा औपचारिक वा अनौपचारिक गट बनतो. त्या गटापुरता संबंधित व्यक्तींच्या मनात आपलेपणा असतो आणि इतर गटांतील व्यक्तींबद्दल परकेपणा असतो. समुदाय सर्व दृष्टींनी स्वयंपूर्ण असेल, म्हणजे समुदायाच्या व समुदायातील व्यक्तींच्या सर्व गरजा ह्या बाह्य संपर्काशिवाय भागविल्या जात असतील आणि समुदायातील व्यक्तींचे व गटागटांचे संबंध हे कायम स्वरूपाचे असतील, तर समुदाय हाच महत्त्वाचा गट ठरतो. अशा समुदायातील भेदात्मक इतर गट हे सामुदायिक जीवनास पूरक म्हणून राहतात; किंबहुना गटाधिष्ठित जीवनावरच सामुदायिक जीवन आधारलेले असते.

solved 5
सामाजिक Friday 16th Dec 2022 : 13:42 ( 3 years ago) 5 Answer 9989 +22