दुसरे महायुद्ध कोण जिंकले?www.marathimahiti.com

दुसरे महायुद्ध कोण जिंकले?

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले.

जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.[१][२] यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.


कारणे

जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण व जपानचे चीन, अमेरिका व ब्रिटिश आणि डच वसाहतींवरचे आक्रमण ही दुसऱ्या महायुद्धाची कारणे समजली जातात.[१५] [१६]जगाच्या दोन्ही बाजूच्या या घटनांचे कारण होते जर्मनी व जपानमधील हुकूमशाही सत्ताधीश व त्यांची जगज्जेते होण्याची महत्त्वाकांक्षा. जरी या दोन्ही सत्तांनी आपले पाय पसरवण्यास आधीच सुरुवात केली असली तरी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली ती या झोंडशाहीला झालेल्या सशस्त्र विरोधाने.

जर्मनीत नाझी पक्ष जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आला असला तरी एकदा हातात सत्ता आल्यावर पक्षाधिकाऱ्यांनी जर्मनीतील लोकशाही व्यवस्थेची लक्तरे काढली.[१७] असे असून जर्मन जनतेने त्यांना पाठिंबा दिला कारण पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यावर त्यांना जर्मन स्वाभिमानाला जागे करणारे सरकार प्रथमतःच मिळालेले होते.[१८] पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करताना व्हर्सायच्या तहातील २३१वे कलम जर्मन जनतेला असह्य झाले होते.[१९] या शिवाय साम्यवाद-विरोध आणि आर्थिक सुबत्ता व प्रगतीच्या वचनांना भुलून जर्मनीने नाझी पक्षाला व पर्यायाने एडॉल्फ हिटलरला अमर्याद सत्ता बहाल केली. हिटलरने जर्मनीला आपल्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या सगळ्या देशांना जर्मन सत्तेखाली आणण्याचे वचन दिले व त्यादृष्टीने पावलेही उचलली. नाझी पक्षाने (व स्वतः हिटलरनेही) हिटलरला जर्मनीचा तारणहार असल्याचे भासवले,[२०] व येथून एका भस्मासुराचा जन्म झाला.

इकडे जपानमध्ये क्रिसॅंथेमम (जास्वंदी) वंशाच्या राजांचे राज्य असले तरी खरी सत्ता होती ती सैन्यातील अत्त्युच्च अधिकाऱ्यांच्या टोळक्याकडे. जपानला जगातील महासत्ता करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जपानने या नेतृत्वाखाली मांचुरियावर १९३१मध्ये व चीनवर १९३७मध्ये आक्रमण केले होते. यामागचे कारण होते ते चीन व मांचुरियातील नैसर्गिक संपत्ती बळकावून त्याद्वारे आपला प्रभाव अधिक मजबूत करणे. युनायटेड किंग्डम व अमेरिकेने या युद्धात जरी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी त्यांनी चीनला आर्थिक व सैनिकी मदत केली. याशिवाय त्यांनी जपानविरुद्ध आर्थिक नाकेबंदी करीत जपानला मिळणारे खनिज तेल व इतर रसद कापली. यामुळे जपानला चीन व मांचुरियातील युद्ध जास्त काळ चालू ठेवणे अशक्य झाले व त्यांनी तेथून काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. आता जपानकडे उपाय होते म्हणजे चीनचा जिंकलेला प्रदेश परत करणे, खनिज तेल व इतर कच्च्या मालाची इतर पुरवठे शोधणे किंवा हे मिळवण्यासाठी अजून काही देश/प्रांत जिंकणे. आग्नेय आशियातील फिलिपाईन्स आणि डच, फ्रेंच व ब्रिटिश वसाहतींमधून या खनिजांचा मुबलक पुरवठा होता व हा भाग चीनमधून हल्ला करण्याच्या टप्प्यातही होता. जपानचा समज होता की आशियातील युरोपीय सत्ता युरोपमध्ये सुरू झालेल्या युद्धात गुंतल्या होत्या व आशियात लक्ष देण्याची त्यांना फुरसत नव्हती. सोव्हिएत संघ जर्मनीशी संधान बांधून असले तरी त्यांच्यात कुरबुर सुरूच होती आणि अमेरिका युद्ध करण्याआधी संधी/करार करण्याचा प्रयत्न करेल. ही परिस्थिती जपानने आग्नेय आशिया गिळंकृत करण्यास साजेशीच होती. हा अंदाज बांधून जपानने डच व ब्रिटिश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड फुटले.

सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. त्याला खीळ घालण्यासाठी जपानने डिसेंबर ७, १९४१रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बर येथील नौसेना तळावर जबरदस्त हल्ला केला व तेथील आरमार उद्ध्वस्त केले. अमेरिकेला आता युद्धात उतरणे भागच होते. अशा प्रकारे अमेरिकेचा या युद्धात प्रवेश झाला.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 12:19 ( 3 years ago) 5 Answer 6152 +22