नियोजन आणि नियंत्रण यांचा काय संबंध आहे?www.marathimahiti.com

नियोजन आणि नियंत्रण यांचा काय संबंध आहे?

नियोजनानुसार प्रत्यक्षात कार्य होते आहे किंवा नाही, हे पडताळून पाहणे म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रण ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून तिचे कार्य योजना आखल्यापासून सुरू होते.

नियोजन हा नियंत्रणाचा पाया मानला जातो. नियोजनात निश्चित केलेल्या उद्दिष्टांप्रमाणे कार्य केले जाते किंवा नाही, हे पाहण्याचे कार्य नियंत्रणात केले जाते. व्यवस्थापन-प्रक्रियेची सुरुवात नियोजनाने होते, तर शेवट नियंत्रणकार्याने होतो. नियोजन ही उद्दिष्टे निश्चित करून देते व या उद्दिष्टांप्रमाणे प्रत्यक्ष कार्याची तुलना करण्याचे कार्य नियंत्रणांतर्गत केले जाते. अचूक नियंत्रणकार्यामुळे व्यवसायाच्या भविष्यकालीन कार्यात नियमितपणा आणि सातत्य राखता येते. व्यवसायाची कार्ये विशिष्ट दिशेने व विशिष्ट प्रकारे होण्यासाठी नियंत्रण मार्गदर्शन करते. नियंत्रणामुळे सर्वप्रथम गतकाळातील कार्याची किंवा पूर्ण झालेल्या कार्याची तुलना प्रमाणित कार्याशी केली जाते; परंतु जे कार्य होऊन गेलेले आहे, त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. फारतर जे कार्य भूतकाळात झाले, त्या कार्याचा अभ्यास करून अपेक्षित प्रमाणाइतके कार्य का झाले नाही, याचा अभ्यास करता येतो, तसेच त्याची कारणे शोधून काढता येतात. भविष्यकाळात केल्या जाणाऱ्या कार्यात मागील दोष पुन्हा उद्भवू नयेत म्हणून आवश्यक त्या उपाययोजना नियंत्रणाद्वारे सुचविल्या जातात. पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती भविष्यकाळात होऊ नये, तसेच मागील उणिवा दूर करता याव्यात या हेतूंनी कित्येकदा भविष्यकाळात केल्या जाणाऱ्या कार्यात आवश्यक ते बदल केले जातात.

नियंत्रण हे सातत्याने चालणारे कार्य आहे. कार्याचे विश्लेषण करून दोष वा उणिवा दूर करण्यासाठी, तसेच कार्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी व त्या सुधारणा केल्यावरही नियंत्रणाच्या कार्याला पुन्हा नव्याने प्रारंभ करावा लागतो. अशा रीतीने सातत्याने नियंत्रण व सुधारणा कार्याचा पुनःपुन्हा फेरआढावा घेऊन त्यात परिष्करणे करणे, व्यवसायाला ऊर्जितावस्था आणून देण्याच्या दृष्टीने इष्ट ठरते. नियंत्रण हे अधिकार-प्रदानाचा पाया मानले जाते. वरिष्ठ आपल्या कनिष्ठांना अधिकार प्रदान करतात. अधिकार-प्रदानाबरोबरच त्यांना नियंत्रणाचा अधिकार प्राप्त होतो. नियंत्रण हे गतिमान स्वरूपाचे कार्य असून त्याची जबाबदारी संघटनेतील सर्व स्तरांवर प्रमुख किंवा पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची असते. नियंत्रणक्षेत्र जितके लहान असेल, तितके व्यवसायातील कार्य व नियंत्रण अधिक प्रभावीपणे व कार्यक्षमतेने होते. एखाद्या अधिकार्याच्या नियंत्रणाखाली प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्तीत जास्त किती असणे योग्य ठरेल, याबद्दल अनेक व्यवस्थापनतज्ज्ञांनी मते व्यक्त केलेली आहेत.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:27 ( 3 years ago) 5 Answer 4161 +22