पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक कोण होता?www.marathimahiti.com

पोर्तुगीज सत्ता, भारतातील :

सोळाव्या शतकात व्यापारासाठी अनेक यूरोपीय हिंदुस्थानात आले. त्यांपैकी पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६१ अखेर अधिसत्ता गाजवली. नौदलात पुढारलेले पोर्तुगीज पंधराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून व्यापारासाठी भारतात आले. दुसऱ्या दों जुआंव राजाचा साहसी प्रतिनिधी पेद्रू द कूव्हील्यांउं हा भारतात येणारा पहिला पोर्तुगीज. १४८८ मध्ये तो अरब व्यापारीवेषात कननोर येथे पोहोचला. १४९१ मध्ये त्याने गोवा, कालिकत व मलबार किनाऱ्यावर मिळालेली माहिती गुप्तपणे पोर्तुगाल राजाच्या कैरो येथील प्रतिनिधीला पाठविली. यानंतर वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून १४९८ मध्ये कालिकत जवळच्या एका खेड्यात उतरला. त्याने सामुरी राजापासून कालिकत येथे वखार घालण्याची परवानगी मागितली. यानंतर दोन वर्षांनी पेद्रो आल्व्हरीश काब्राल भारतात आला (१५००). त्याने कालिकत येथे वखार घातली व व्यापार सुरू केला. काब्राल याने कोचील (कोचे) बंदराचा शोध लावून महत्त्वाची कामगिरी केली. भारतातील राजकीय परिस्थितीच्या माहितीवरून त्याच्या हे लक्षात आले की, कालिकत व कोचीन येथील राजांच्या शत्रुत्वाचा फायदा घेऊन कोचीनच्या राजाशी मैत्री संपादन करता येईल. १५०२ मध्ये पोर्तुगालच्या राजाने वास्को द गामा व इश्तेव्हव द गामा यांना भारतात धाडले. कालिकत येथे आल्यानंतर त्यांनी अरब व इराणी व्यापाऱ्यांना हाकलून पोर्तुगीजांना व्यापारी मक्तेदारी देण्यास सामुरी राजास सांगितले. कोचीन येथे वास्को द गामाने वखार घातली. तो परत गेल्यानंतर ⇨ अफांसो द अल्बुकर्क व फ्रॅन्सिस्कू द अल्बुकर्क हे भारतात आले. पोर्तुगीजांचे भांडण चालू होते. कोचीन येथे आलेल्या सामुरीच्या सैन्याला अल्बुकर्कने हाकलून देऊन, तेथे किल्ला बांधण्यास सुरुवात केली. १५०५ मध्ये पोर्तुगीजांच्या लक्षात आले की, मलबार किनाऱ्यावरील व्यापार ताब्यात ठेवण्यास पोर्तुगालहून ठराविक कालावधीत धाडलेल्या व्यापारी गलबतांचा फारसा उपयोग होणार नाही. म्हणून फ्रॅन्सिस्कू द आल्मेईदा हा सैन्य व आरमार घेऊन भारतात पहिला व्हाइसरॉय म्हणून आला. याला किलवा, अंजदीव, कननोर व कोचीन येथे गड बांधण्यास सांगितले होते. थोड्याच दिवसांत पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता अशी प्रस्थापित केली की, त्यांनी ठिकठिकाणी बांधलेल्या गडांवरून पोर्तुगीज आरमारी परवाना घेतल्याविना भारतीयांना आपली गलबते बाहेर काढता येत नसत. हळूहळू पोर्तुगीजांनी आपली सैन्यशक्ती वाढवून अंजदीव, कननोर, कोचीन येथे तटबंदी करून तेथील अरबी व भारतीय गलबते नष्ट केली.

विजापूरच्या आदिलशाहाने १५१० च्या सुमारास गोव्यावर स्वारी करून गोवा घेतला. विजयानगर सम्राटाचा आरमारी प्रमुख तिम्मय्या (तिमोजा) याला गोवा आदिलशाहाच्या तावडीतून सोडवावयचा होता. म्हणून त्याने पोर्तुगीजांची मदत घेतली. या निमित्ताने अफांसो अल्बुकर्क याने १५१० मध्ये गोवा जिंकले. येथपासूनच अल्बुकर्कने भारतात पोर्तुगीज सत्ता वाढविण्यास सुरुवात केली.

अल्बुकर्क हा भारतातील पोर्तुगीज सत्तेचा पहिला गव्हर्नर जनरल. पोर्तुगीजांनी गोवे येथे सुरू केलेल्या गुलामांच्या व्यापारामुळे ते गुलामांच्या व्यापाराचे केंद्र बनले. अल्बुकर्कच्या अमानुष कृत्यांमुळे कालिकत, कोचीन व कननोर येथील राजांनी त्याने गोवा सोडावा, म्हणून पोर्तुगालच्या राजाला पत्र पाठविले होते पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गोव्यावर ताबा मिळाल्यावर कुडाळपासून चित्ताकूलपर्यंतचा प्रदेश पोर्तुगीजांच्या अंमलाखाली गेला. १५२० मध्ये पोर्तुगीजांनी सासष्टी, बारदेश व गोवा भागातील इतर प्रदेश जिंकले. १५२१ पासून गोवा ही पोर्तुगीजांची पूर्वेकडील प्रमुख वसाहत झाली. १५३१ मध्ये नू द कून्या याने गुजरातच्या सुलतानाबरोबर लढाई करून व दीव घेऊन १५३४ मध्ये वसई प्रांत जिंकला. पुढे पोर्तुगीजांनी दमण व आसपासचे किल्ले घेतले. १५८० च्या सुमारास पोर्तुगीजांच्या सत्तेखाली दीव, दमण, मुंबईसह वसई प्रांत, चौल, गोवे बेट, सासष्टी, बारदेश, होनावर, बार्सेलोर, मंगळूर, कननोर, कोचीन, नेगापटम् असे प्रदेश होते.

solved 5
ऐतिहासिक Thursday 8th Dec 2022 : 13:46 ( 3 years ago) 5 Answer 6237 +22