मराठी कादंबरीचे जनक कोण?www.marathimahiti.com

मराठी कादंबरीचे जनक कोण?
हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे मराठी कादंबरीचे जनक मानले जातात.

ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरिभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.

प्रकाशित साहित्य :

आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबऱ्या लिहिणाऱ्या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवा व जबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), श्रुतकीर्तचरित (काँग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राईड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे ’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबऱ्यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१ च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती. सुरुवातीच्या काळात साहित्याला एक वेगळी उंची प्राप्त करून देण्यामध्ये हरी नारायण आपटे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले सामाजिक आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्यांच्या कादंबऱ्यांतून समाजाचं यथार्थ चित्रण केलं गेलं.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:29 ( 3 years ago) 5 Answer 5452 +22