महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण संस्था किती आहेत?www.marathimahiti.com

महाराष्ट्रात ३० वैद्यकीय आणि १३ दंतवैद्यकीय महाविद्यालये आहेत.

वैद्यकीय शिक्षण

वैद्यकाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वैद्याने त्या क्षेत्रातील ज्ञान व कौशल्य प्राप्त करण्यासाठी काही काळ औपचारिक शिक्षण घेण्याची परंपरा भारतात सु. अडीच ते तीन हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. वेदोत्तर काळात इ.स.पू. सहाव्या शतकापासून ⇨तक्षशिला विद्यापीठात शिक्षणासाठी परदेशातील विद्यार्थीही येत असत. अशाच प्रकारची कीर्ती ⇨नालंदा विद्यापीठ (इ. स. सहावे ते बारावे शतक), वल्लभी विद्यापीठ (सातवे शतक), ⇨विक्रमशिला विद्यापीठ (आठवे ते बारावे शतक) इ. विद्यापीठांनी प्राप्त केली होती. बाराव्या शतकानंतर अशा विद्यापीठांचे अस्तित्व पूर्णपणे लोपले. नंतरच्या काळात राजाश्रय किंवा धर्ममंदिरांची मदत यांच्या आधाराने खाजगी पाठशाळा चालवून मान्यवर वैद्यांनी आयुर्वेदाचे शिक्षण पुढे नेले.

पाश्चात्त्य देशांत ही परंपरा इ. स. पू. पाचव्या शतकामध्ये ग्रीक तत्त्ववेत्ते ⇨हिपॉक्राटीझ यांच्यापासून सुरू झाली. कॉस या बेटावर आणि अथेन्समध्ये त्यांनी उभारालेल्या विद्यालयांचे अवशेष अजून आढळतात. ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबर पहिल्या – दुसऱ्या शतकांपासून ग्रीक वैद्यकीय संस्थांची जागा ख्रिस्ती मठांनी घेतली व यूरोपमध्ये सर्वत्र धर्माश्रयाने वैद्यकीय शिक्षण दिले जाऊ लागले.

शवविच्छेदनावरील कडक निर्बंध आणि प्रयोगशीलतेचा अभाव यांमुळे तेथे वैद्यकाची प्रगती फारशी झाली नाही. नवव्या शतकापासून यूरोपात सालर्नो, बोलोन्या, मॉंपेल्ये, पॅरिस, प्राग, ऑक्सफर्ड यांसारखी विद्यापीठे स्थापन होऊ लागली. त्यामुळे मध्ययुगात बरेचसे वैद्यकीय शिक्षण विद्यापीठांकडे आले; परंतु तेथे रुग्णांशी फारसा संबंध येत नसल्यामुळे हे शिक्षण बरेचसे सैद्धांतिक, पुस्तकी स्वरूपाचे असे. त्याच वेळी उमेदवारी पद्धतीने जुजबी शिक्षण देऊन परवाना देणाऱ्या अनेक व्यावसायिक संघटना (गिल्ड) देखील होत्या. प्रत्येक व्यक्ती एकाच उपचार तंत्राचा अभ्यास करून तेच तंत्र व्यवसायामध्ये वापरीत असे. उदा., सूतिका तंत्र, हाडे जुळविणे, मुतखडा काढणे, अंतर्गळावर उपचार, औषधी वनस्पती गोळा करणे इत्यादी. वैद्यकाचे साकल्याने ज्ञान असणारे फार थोडे वैद्य असत.

सोळाव्या शतकापासून रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स या संस्थेची इंग्लंडमध्ये स्थापना झाली व तशाच प्रकारच्या मान्यवर संस्था इतर देशांतही वैद्यकीय व्यावसायिक परवाने देण्याचे कार्य करू लागल्या. रुग्णालयीन अनुभवाची जोड सैद्धांतिक शिक्षणाला मिळू लागली. अमेरिकेतही अठराव्या शतकात पेनसिल्व्हेनिया व हार्व्हर्ड येथे वैद्यकीय शाळा निघाल्या.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकेतील वैद्यकीय संघटनेने वैद्यकीय शिक्षणाच्या पद्धतीबद्दल पुनर्विचार करायला सुरुवात केली. शिक्षणातील गूढता नाहीशी करून ते संपूर्णपणे वैज्ञानिक अभ्यासावर आधारित करावे; त्याचा दर्जा सुधारावा या हेतूने कार्नेगी फाउंडेशनतर्फे अब्राहम फ्लेक्सनर यांनी १९१० साली एक अहवाल सादर केला. त्यातील शिफारशींनुसार प्रयोगशाळा, रुग्णालये, प्रशिक्षित शिक्षक, विद्यार्थ्यांची आदर्श संख्या यांसारख्या अनेक बाबतींत अमेरिकेत व जगभर सुधारणा होऊ लागल्या. त्यावेळी अमेरिकेत असलेल्या सु. १५० वैद्यकीय शाळांपैकी जवळजवळ निम्म्या संस्था अपुऱ्या सोयीसुविधांमुळे फ्लेक्सनर अहवालानंतरच्या वीस वर्षांत बंद कराव्या लागल्या. रॉकफेलर फाउंडेशनसारख्या दानशूर संस्थांनी वैद्यकीय शिक्षणाच्या सुधारणेसाठी बरीच मदत करून त्यांचा दर्जा सुधारला. त्यामुळे अमेरिकेतून यूरोपमध्ये शिक्षणासाठी जाणारा विद्यार्थ्यांचा प्रवाह उलट दिशेने वाहू लागला.

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर वैद्यकीय शिक्षणाची परिषद प्रथम १९५३ साली लंडन येथे भरली. त्यानंतर दर चार-सहा वर्षांनी अशा परिषदा विविध देशांमध्ये भरून वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि पद्धती सुधारणे व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यात समानता आणणे या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. आपल्या राष्ट्रीय गरजा लक्षात घेऊन रशिया व चीन यांसारख्या राष्ट्रांनी शिक्षणाचा कालावधी कमी करणे, देशी औषध पद्धतींचा समावेश करणे, वैद्यकीय साहाय्यकांचे अभ्यासक्रम सुरू करणे, अत्यल्प खर्चाचे साधे वैद्यक खेड्यांपर्यंत पोहोचविणे यांसारखे अनेक प्रयोग यशस्वीपणे केले आहेत.

भारतात आधुनिक वैद्यकाचा प्रसार यूरोपीय देशांच्या वसाहतींबरोबर सतराव्या शतकापासून हळूहळू होऊ लागला; परंतु त्याच्या शिक्षणाची सोय मात्र एकोणिसाव्या शतकापासून मर्यादित प्रमाणात उपलब्ध झाली. कोलकाता (कलकत्ता, १८३५), पणजी (१८४३), मुंबई (१८४५) आणि चेन्नई (मद्रास, १८५०) येथे वैद्यकीय शाळा या काळात स्थापन झाल्या. त्यांना यूरोपातील रॉयल कॉलेजासारख्या संस्थांकडून मान्यता मिळाली; परंतु खऱ्या अर्थाने भारतीय अशा वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात १८५६ मध्ये झाली.

नवीनच स्थापन झालेल्या मुंबई, कोलकाता व चेन्नई या विद्यापीठांनी या सुमारास वैद्यकीय शिक्षण आपल्या कक्षेत घेऊन एल्‌.एम.एस्‌. किंवा एम्‌.बी.बी.एस्‌. यांसारख्या पदव्या सुरू केल्या. त्यानंतरच्या नव्वद वर्षांत वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या गरजेनुसार वाढत जाऊन स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी अविभक्त भारतात १९ महाविद्यालये व लायसेन्शिएट म्हणजे अनुज्ञप्ती किंवा परवाना, पदविका इ. अभ्यासक्रमांच्या १९ वैद्यकीय शाळा होत्या.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रसाराचा वेग झपाट्याने वाढला. ग्रामीण जनता, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण इ. घटकांमुळे निर्माण होणाऱ्या देशाच्या आरोग्यविषयक गरजांना अनुरूप असे बदल अभ्यासक्रमात वेळोवेळी करण्याबद्दल सूचना करण्यात आल्या. पूर्वपरिस्थितीचा अभ्यास करून असे बदल सुचविणाऱ्या समित्यांमध्ये भोर (१९४६), मुदलियार (१९६२), श्रीवास्तव (१९७५) व बजाज (१९९३) समित्या आणि राष्ट्रीय आरोग्यविषयक धोरण (१९८३) यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 11:38 ( 3 years ago) 5 Answer 4877 +22