Login
$zprofile = 'profile'; $zcat = 'category'; $zwebs = 'w'; $ztag = 'tag'; $zlanguage = 'language'; $zcountry = 'country'; ?>
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी मातृभाषा, हिंदी, इंग्लिश, समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, भूमिती व वैकल्पिक तीन वा चार विषय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, कृषिविद्या, तंत्रविद्या, संगीत इत्यादी साठ विषयांतून निवडावयाचे असतात.
शिक्षणाच्या अवस्थेनुसार उद्दिष्टे बदलतात. त्यामुळे अभ्यासक्रमही बदलतो. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकाला ज्ञानार्जनाची मूलभूत साधने प्राप्त करून देणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात लेखन, वाचन, गणन या कौशल्यांना प्राधान्य असते. माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकांच्या नैसर्गिक क्षमतेचे अन्वेषण करून तदनुसार शैक्षणिक अनुभव पुरविणे हे असते. त्यामुळे तेथील अभ्यासक्रमात अनेक विषय वैकल्पिक असतात. वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या मूल्यांची रुजवणूक करता येते. अभ्यासक्रमामुळे सामाजिक संस्कृतीशी विद्यार्थ्यांचा परिचय होतो. सामाजिक परिवर्तन व रूढी-परंपरा याच्ंयात समन्वय साधण्यास इतिहासविषयाच्या अभ्यासक्रमाची खूप मदत होते. अभ्यासक्रमामुळे शिक्षणात समान गुणवत्ता राखण्यासाठीही मदत होते. उच्च शिक्षणाचे ध्येय पारंगतता असल्यामुळे तेथील अभ्यासक्रमात एका विषयाच्या सखोल अभ्यासक्रमाची अपेक्षा असते. प्रत्येक अवस्थेत वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांखेरीज काही सामान्य उद्दिष्टे असतात. उदा., ‘आदर्श नागरिक घडविणे’ हे उद्दिष्ट सर्व अवस्थांना सामान्य आहे. अशी सामान्य उद्दिष्टे साधणाऱ्या अनुभवांचाही अंतर्भाव अभ्यासक्रमात होतो; तथापि अवस्थांनुसार अभ्यासक्रम आखताना पुढील दोन तत्त्वे पाळावी लागतात : (१) प्रत्येक अवस्थेच्या शेवटी जे विद्यार्थी जीवनात प्रवेश करतात, अशांसाठी अभ्यासयोजना स्वयंपूर्ण असावी. (२) ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढील अवस्थेत चालू राहणार असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम दोन्ही अवस्थांचा सांधा साधणारा, पहिल्या अवस्थेची उद्दिष्टे साधणारा आणि पुढील अवस्थेच्या शिक्षणाची पूर्वतयारी करणारा असावा.
महाराष्ट्रात प्राथमिक शाळेचा विद्यार्थी भाषा, अंकगणित, जमाखर्च, भूमिती, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल व हिंदी हे विषय शिकतो. शिवाय त्याला सूतकाम, शिंपीकाम, सुतारकाम, कृषिविद्या, भरतकाम यांपैकी एक व्यवसाय हस्तगत करावा लागतो. ज्ञानार्जनाची साधने हस्तगत करणे व नागरिकासाठी आवश्यक ते ज्ञान संपादन करणे, हा दुहेरी उद्देश या अभ्यासक्रमाच्या रचनेत आढळतो. माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी मातृभाषा, हिंदी, इंग्लिश, समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, भूमिती व वैकल्पिक तीन वा चार विषय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, कृषिविद्या, तंत्रविद्या, संगीत इत्यादी साठ विषयांतून निवडावयाचे असतात. सारांश, माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमात सामान्य उद्दिष्टांसाठी आवश्यक विषय व विद्यार्थ्यांची क्षमता व आवड यांना अनुसरून ऐच्छिक विषय असे दोन भाग वर उल्लेखिलेल्या तत्त्वांनुसार आढळतात. महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही एकूण विषयांची संख्या ठरावीक असून त्यांतील काही आवश्यक व काही ऐच्छिक असतात.
विकास : या संकल्पनेची आधुनिक व्याप्ती, तिच्यामधील अंतर्भूत विषय व मांडणी या गोष्टी त्रिकालाबाधित वा स्थिर नाहीत. त्या शेकडो वर्षे विकसित होत आल्या आहेत, बदलत आहेत आणि बदलत राहतील. आपल्याकडे वैदिक व प्राचीन काळी आश्रम, विहार, मठ, तसेच तक्षशिला, नालंदा, काशी, उज्जयिनी यांसारख्या विद्याकेंद्रांतून वेद, वेदांगे, उपनिषदे, रूढ धार्मिक आचार, बौद्धधर्मानुसार व्रते, तत्त्वज्ञान इत्यादी तत्कालानुसार उपयुक्त धार्मिक शिक्षण देत असत. शिवाय व्यावहारिक शिक्षण म्हणून काही आश्रमांत व विद्याकेद्रांत धनुर्विद्या, अन्य क्षत्रिय वा युद्धविद्या, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नानाविध कला, निरनिराळे व्यवसाय शिकवीत. व्यवसायांचे शिक्षण घराघरांतून अनुकरणाने मिळे. राजगृहासारख्या ठिकाणी राजधर्मानुकूल विषय व नानाविध कला यांचे शिक्षण देत. सामान्यतः व्यक्तिमात्राला वर्णानुकूल विद्या शिकवीत असा अभ्यासक्रम असे.
मध्ययुगात मंदिरशाळा, पाठशाळा व घर यांतून ब्राह्मणांना धार्मिक व्यवसायानुकूल विशिष्ट विद्या व अन्य वर्णांना राजवाड्यांत, घराघरांत विशिष्ट व्यावसायिक विद्या शिकवीत. मुसलमान राजवटीतही मुसलमान धर्म-समाजानुकूल भाषा व विद्या मकतब-मद्रसासारख्या संस्थांतून शिकवीत. एकोणिसाव्या शतकापासून पाश्चात्त्यांचा संपर्क व इंग्रजांचे वर्चस्व यांमुळे जुन्या संस्था व विषय नाहीसे होत गेले आणि नव्या संस्थांतून इंग्रजी भाषा, वाङ्मय, गणित, भारताचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास अशा विषयांची योजना झाली. पहिल्या व विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान व तांत्रिक व्यवसाय-धंदे यांच्या शिक्षणाकडे ओघ वळू लागला. याच काळात शिक्षणाच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाची व महत्त्वाची जाणीव होऊन राष्ट्रीय दृष्टीने अभ्यासयोजना होऊ लागली. स्वातंत्र्योत्तर काळात तर हे दोन्ही प्रवाह एकत्र आले व नवप्रवाह जास्त खोल व प्रभावी झाला. माध्यमिक शिक्षण, विश्वविद्यालयीन शिक्षण अशांचे परीक्षण उच्च आयोग नेमून झाले.
पाश्चात्त्य व अन्य देशांतही असेच विकसन दिसते. स्पार्टा या प्राचीन ग्रीक नगरराज्यात शारीरिक व तत्कालीन पद्धतीचे सैनिकी शिक्षणच दिले जाई. त्याचीच राज्याला व समाजाला गरज होती. सुधारलेल्या व समृद्ध अशा अथेन्सच्या नगरराज्यांत, स्वातंत्र्याचे हक्क उपभोगणाऱ्या नागरिकांसाठी राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञान, वक्तृत्वकला, वाङ्मय, नानाविध ललितकला शिकवीत. असे नागरिक मात्र १० टक्केच असत. त्यानंतर रोमन साम्राज्यात व पुढे ख्रिस्ती मठमंदिरांत वेगळा अभ्यासक्रम झाला. रोमन साम्राज्यात न्यायशास्त्राला महत्त्व आले, तर मठमंदिरांत बायबल धर्मतंत्र, धार्मिक रूढी यांच्या अभ्यासाने कला, व्यावहारिक शास्त्रे, वाङ्मय यांना बाजूला सारले. विद्येचे पुनरुज्जीवन व धर्मसुधारणा यांमुळे अभ्यासक्रमांत पुन्हा बदल झाले.
अठराव्या शतकाच्या शेवटी रूसोने विचारक्रांती घडविली. अभ्यासक्रमांत मोठे बदल होऊ लागले. निसर्ग, विज्ञान, समाजजीवन यांचा अभ्यास व अनुभवजन्य ज्ञान यांना स्थान मिळू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकात नवनवे व्यवसाय, धंदे, वाफ-तेल, वीज-अणू यांच्या शक्तीवर चालणारी विविध यंत्रे आली व नवनव्या अनेक विषयांची योजना होऊ लागली. याच काळात मानसशास्त्राचा विकास झाला. प्रातिनिधिक लोकशाहीसारखी नवी राजकीय रचना विकास पावली. प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली. या सर्वामधून अभ्यासक्रमाला आणखी निराळे वळण मिळाले. पूर्वी अभ्यासक्रमामध्ये विशिष्ट विषय नियोजित करीत. या काळात विषय व त्यांची आखणी तर बदललीच; शिवाय विषयाबरोबरच व काही वेळी विषयाऐवजी प्रयोग, अनुभव, स्वयंकृती, योजनासंधी, विषयांचा समवाय अशा गोष्टींना अभ्यासक्रमांत स्थान मिळू लागले. नव्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीने जरूर असे विषय, अनुभव यांचाही समावेश झाला. शिक्षणाच्या अवस्थांच्या रचनेत बदल झाले व याचाही अभ्यासक्रमांवर परिणाम झाला. एकंदरीत अभ्यासक्रम नेहमी विकसनशील असणार आहे.
अभ्यासक्रमाच्या उत्क्रांतीच्या या इतिहासात अभ्यासविषय निवडण्याची दोन सूत्रे अंतर्भूत आहेत : एक, उपयुक्तता व दुसरे, संस्कारक्षमता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत संस्थांतर्गत शिक्षण फक्त उच्चवर्गीय मुलांना मिळे. म्हणून त्या शिक्षणाचा भर बौद्धिक संस्कारांवर होता व ते शिक्षण व्यवसायविन्मुख होते. अशा शिक्षणाला ‘उदार संस्कारी शिक्षणʼ ही संज्ञा देतात. शिक्षणाचा प्रसार होऊन सर्व थरांच्या मुलांना शिक्षण मिळू लागल्यावर उदार संस्कारी शिक्षणाच्या उणिवा दृष्टोत्पत्तीस आल्या व अभ्यासक्रमात उपयुक्त विद्येचा समावेश होऊ लागला. अभ्यासक्रमात संस्कारक्षम व उपयुक्त विद्याकलांचा योग्य प्रमाणात समावेश करणे हा आधुनिक कल होय.
अभ्यासक्रम ही सर्वसमावेशक अशी योजना आहे. जीवन व शिक्षणाचा संबंध जोडून कृतिप्रधान अनुभव देण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमातून व्हावा, यासाठी अभ्यासक्रमरचना केलेली आहे. अभ्यासक्रमातून ज्ञान, कौशल्य, वृत्ती, प्रयोग, व्यवसाय इत्यादींची जोपासना करणारे अनुभव दिले जातात. जीवन व शिक्षणाचा संबंध जोडून कृतिप्रधान अनुभव देण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमांतून व्हावा, यासाठी अभ्यासक्रमरचना केलेली असते. इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाʼवर आहे. अभ्यासक्रमविषयसंशोधन ‘महाराष्ट्र अभ्यासक्रम संशोधन मंडळʼ व ‘पाठ्यपुस्तक मंडळʼ यांच्यामार्फत होते.
योग्य अभ्यासक्रम तयार करण्याच्या कार्यात आता शास्त्रीय दृष्टी, प्रयोगशीलता आली आहे. प्रचलित वा सूचित अभ्यासक्रमांच्या यशापयशांचे आता प्रयोगांद्वारा परीक्षण केले जाते. नंतर जरूर वाटतील त्या सुधारणा केल्या जातात. असे हे प्रयोगाचे व मूल्यमापनाचे कार्य वेळोवेळी ठिकठिकाणी केले जाते. अभ्यासक्रमाची रचना करताना (१) निर्णयक्षमता, (२) ‘स्वʼ जाणीव, (३) समस्यानिराकरण, (४) समानानुभूती, (५) व्यक्तिव्यक्तींतील संबंध, (६) परिणामकारक संप्रेषण, (७) ताणतणावांचे समायोजन, (८) सर्जनशील विचार, (९) भावनांचे समायोजन आणि (१०) चिकित्सक विचार या दहा कौशल्यांबरोबरच त्यात सर्व पाठ्यक्रमाचा समावेश होतो. अभ्यासक्रम ही सर्वसमावेशक व व्यापक अशी योजना आहे. त्याच्या आधारे विविध पाठ्यक्रम तयार केले जातात. सर्वांत अगोदर अभ्यासक्रम तयार होतो. शिक्षणाचे ध्येय व उद्दिष्ट ठरविल्यानंतर त्यानुसार अभ्यासक्रम तयार करणे हा शिक्षणप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. हे शिक्षकांच्या हातातील अध्यापनाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे, की जे वापरून शिक्षक ध्येय – उद्दिष्टांनुरूप विद्यार्थी घडवू शकतो. विद्यार्थांत योग्य ते परिवर्तन घडवून आणू शकतो. शिक्षणाची अमूर्त ध्येये अभ्यासक्रमांतून मूर्त स्वरूप धारण करतात. त्यात प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन स्तरांवर शिकविल्या जाणाऱ्या सर्व विषयांचा समावेश असतो. अभ्यासक्रमात विशिष्ट स्तराच्या गरजा, अपेक्षा आणि क्षमता प्रतिबिंबित झालेल्या असतात. अभ्यासक्रमाद्वारे शिक्षणप्रक्रिया प्रत्यक्षात उतरविली जाते. अभ्यासक्रमाची आखणी शैक्षणिक तत्त्वज्ञान व शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित असते.
अभ्यासक्रमाच्या विकसनामधून स्पष्ट झालेले प्रवाह, त्यांचे महत्त्व व कार्य पुढीलप्रमाणे :
अभ्यासक्रम विकसनशील व लवचीक राहावा. शिक्षण ही समाजजीवनाची धारणा तसेच समाजविकसनाची शक्तीही आहे. बदलती परिस्थिती, विकसित शास्त्रे, विचार, विज्ञान, तंत्रविद्या, यंत्रसाधना यांच्याबरोबर व अनुरोधाने अभ्यासक्रमही बदलत राहावेत; नाहीतर कोणत्याही समाजातील शिक्षणाची उद्दिष्टे सफल होणार नाहीत.
अभ्यासक्रम आखताना व्यक्तिव्यक्तींमधील आणि समाजासमाजांमधील भिन्नता व साधर्म्य या दोन्ही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. काही साधर्म्य स्वाभाविकच आहे; मात्र बुद्धी, रुची, शरीरक्षमता, परिस्थिती, आनुवंशिकता यांमुळे व्यक्तिभिन्नता निर्माण होते. तसेच ते समाजाच्या व राष्ट्राच्या बाबतही असते. त्यांचा इतिहास, त्यांची स्थिती, त्यांच्या समस्या, गरजा, त्यांची उपलब्ध साधने यांमुळे भिन्नता निर्माण होते; पण मूलभूत उद्दिष्टे, तत्त्वे या दृष्टीने काही साधर्म्यही असते. हे सर्व लक्षात घेऊन अभ्यासक्रम आखावा लागतो. यामुळे अभ्यासक्रमाचे आवश्यक व ऐच्छिक असे विभाग पडतात. साधर्म्य वा सामान्य गरजा लक्षात घेऊन आवश्यक विभाग ठरवितात. त्याला ‘मूलभूत वा गाभाभूत अभ्यासविभाग’ म्हणतात. शिवाय भिन्नता लक्षात घेऊन ऐच्छिक विभागाची योजना केली जाते. ऐच्छिक विभागातून व्यक्तीला आपल्या क्षमतेप्रमाणे व अभिरुचीनुसार विषय निवडता येतील अशी योजना केल्याने सांस्कृतिक, बौद्धिक व लैंगिक भेदांतून निर्माण होणाऱ्या समस्या आपोआप सुटतात.
अभ्यासक्रमावर चौरस वा सर्वांगीण शिक्षण या कल्पनेचा परिणाम झालेला दिसतो. सामान्य शिक्षण ही कल्पना व प्रस्तुत चौरस शिक्षण ही कल्पना व्यापक दृष्टीने समानार्थी मानली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणात विशेष भाग असावा, पण याबरोबरच प्रत्येकाला जीवनाच्या विविध पैलूंची किमान ओळख असावी. व्यक्तीच्या जीवनाची एकांगी वाढ न होता ते चौरस व्हावे, नटविलेले व समृद्ध असावे, सर्वगुणसंपन्न असावे, याची आता जाणीव झाली आहे. चौरस अभ्यासक्रमाचे स्थान सार्वत्रिक सक्तीच्या प्राथमिक शिक्षणामध्ये सर्वांत मोठे आहे. पुढील अवस्थांमध्येही ते आहे; पण उतरत्या श्रेणीचे आहे.
अभ्यासक्रम शिक्षणाच्या निरनिराळ्या अवस्थांनुसार असावा लागतो. प्रत्येक अवस्थेसाठी तो स्वयंपूर्ण असावा लागतो व त्याचबरोबर पुढील अवस्थेसाठी पूर्वतयारी करणारा असावा लागतो. आरंभी हे निर्दिष्ट केलेले आहे. आपल्याकडे व अन्य देशांतही हे मान्य झाले आहे; पण शिक्षणाच्या अवस्थांचीच पुनर्रचना चालू आहे. ऐच्छिक, तांत्रिक, व्यावसायिक शिक्षणाच्या व सामान्य शिक्षणाच्या अवस्था ह्या काही वेळा व व्यवसायानुरूप वेगवेगळ्या असतात. यामुळे आधुनिक अभ्यासक्रमाची आखणी करणे अवघड झाले आहे. ठिकठिकाणचे अनुभव लक्षात घेऊन हे प्रश्न सोडविले जातात.
अभ्यासक्रम कृतिप्रधान, अनुभवावर आधारलेला असावी. शिक्षणाचे विशिष्ट उद्दिष्ट साधण्यासाठी विशिष्ट विषय वा विषयगटांची योजना अशी अभ्यासयोजनेची परंपरागत कल्पना असे. विसाव्या शतकाबरोबर ही दृष्टी बदलत आहे. निव्वळ ज्ञानसाधना करून जीवन समृद्ध, यशस्वी होऊ शकत नाही. जीवनासाठी ज्ञान वापरता येण्याची क्षमता, निव्वळ पुस्तकी ज्ञानसाधनेने येत नाही. प्रयोग, अनुभव, प्रत्यक्ष कृती, योजनास्वातंत्र्य वा योजना करण्याची प्रत्यक्ष संधी, सवय यांतूनच निर्माण होणारे ज्ञान व जीवनक्षमता मोलाच्या आहेत, याची जाणीव होत आहे. ज्ञानही झपाट्याने विकसित होत आहे. आजचे तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, समाजशास्त्रांचे ज्ञान लवकरच अपुरे वाटेल, काही वेळा जुने व टाकाऊ ठरेल. अशा वेळी प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा ज्ञानार्जनक्षमता, ज्ञानोपयोग करण्याची क्षमता हीच शिक्षणाची मूलभूत व महत्त्वाची उद्दिष्टे आता मानली जात आहेत. विशेषतः प्राथमिक वा सर्वांसाठी असलेल्या सामान्य शिक्षणयोजनेत ही गोष्ट प्रामुख्याने दिसते.