मानसशास्त्राच्या व्याख्येत वर्तन म्हणजे काय?www.marathimahiti.com

जे. आयझेंक (१९१६− ) यांनी वर्तनाची व्याख्या व्यापक केली. 'व्यक्तिसंवेध आणि इंद्रियगोचर अशा दोन्ही घटानांचा संपूर्ण समुच्चय म्हणजे वर्तन' असे त्यांनी म्हटले. या सर्व ऊहापोहातून मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये काही क्षेत्रे केंद्रवर्ती झाली आहेत.
मानसशास्त्र : माणसाचे मन हाही एक माणसाच्या जिज्ञासेचा विषय आहे. ग्रहगोल, वनस्पती, पशुपक्षी यांच्याविषयीच्या जिज्ञासेतून जशी भौतिकशास्त्रे व जैवशास्त्रे निर्माण झाली, तशी स्वतःविषयीच्या जिज्ञासेतून ‘मानसशास्त्र’ ही शाखा निर्माण झाली.

स्वतःविषयीची जाणीव माणसाला आंतरिक आणि बाह्य अशी दोन ‘विश्वे’ उपलब्ध करून देते. त्यांमधील भेद लक्षात येत असतानाच बाह्य जगाचे ‘असणे’ आणि त्याचा आपल्याला अनुभव येणे, यांत फरक आहे हेही माणसाच्या लक्षात आले. यातूनच वस्तुनिष्ठ विधानांविषयीचा आग्रह हा जो शास्त्राचा पाया असतो, तो निर्माण झाला कारण फक्त अनुभवविश्वातील विधानांच्या जोरावर विचारविनिमय होऊ शकत नाही. जे जाणिवांचे किंवा अनुभवांचे, तेच त्यांच्यातील संबंधांचे बाबतीतही. कशामुळे काय होते? हा कार्यकारणभाव जाणून घेताना ‘मला वाटलेला’ संबंध आणि ‘प्रत्यक्षात असलेला’ संबंध यांत फरक दिसून येतो व मग निसर्गनियम आणि माझी समजूत यांतील दरी कमी करत करत सार्वत्रिक सिद्धांत ही व्यक्तिनिरपेक्ष ज्ञानाची कोटी निर्माण होऊ लागते. परंतु कोणत्याही सिद्धांताबाबत नव्या दृष्टीने, एखाद्या नव्या अनुभवाने किंवा अधिक निरीक्षणाने शंका उपस्थित होऊ शकते. अशा वेळी त्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न पडताळा पाहून करता येतो. त्यातून (१) शंका चुकीची ठरू शकते किंवा (२) सिद्धांतात सुधारणा होऊ शकते किंवा (३) नवा सिद्धांत मांडला जाऊ शकतो. अशा प्रकारे शास्त्राची प्रगती होत जाते.

वस्तुनिष्ठता, सार्वत्रिकता आणि प्रत्यंतरक्षमता या मुख्य वैशिष्ट्यांमुळे आधुनिक शास्त्रे प्रगत झाली आहेत. या शास्त्रांच्या मालिकेत स्थान प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नातून प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेची प्रस्थापना गेल्या शतकात झाली. मानसशास्त्र ही ज्ञानशाखा वेगळ्या कोटीतील आहे, तिला विज्ञानाची कसोटी लावणे शक्य नाही, इष्टही नाही, हा विचार एकीकडे तर ही वेगळ्या कोटीची ज्ञानशाखा म्हणून मानण्याचे कारण नाही, हा विचार दुसरीकडे. अशी मानसशास्त्रविषयक धारणांची द्वंद्वे दीर्घकाळ चालली. अजूनही यांपैकी कोणत्याच धारणेचा निःसंदिग्धपणे स्वीकार सर्व विचारवंतांनी केलेला नाही. दोन्ही प्रकारच्या गृहीतांमधून विचार व संशोधन चालू आहे. एकीकडे वैज्ञानिक पद्धतीने मिळणारे काटेकोर सिद्धांत अपुरे पडतात आणि दुसऱ्या गटातील विचारप्रणालीमुळे प्रत्यंतराची संधी अथवा गरजच नाकारली जाते परंतु ‘व्यक्तिनिष्ठ प्रत्यय’ हा तर सार्वत्रिक होऊ शकत नाही.

वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे सुरू झालेल्या वैचारिक प्रवाहाला प्रथम या अभ्यासविषयाबद्दलची स्पष्ट संकल्पना असण्याची गरज होती. मानसशास्त्रज्ञ कशाला अभ्यास करतात ? पूर्वापार तत्त्वज्ञानातील विचारप्रणालीशी जो विचार निगडित होता, तो जीविताच्या अंतिम ध्येयाशी, श्रेयाशी बांधलेला होता तो प्रामुख्याने विध्यर्थी होता. त्याचप्रमाणे माणसाचे सत्त्व म्हणजे देह नव्हे, शारीरिक गुणधर्म नव्हेत किंवा त्यात अंतर्हित असणारे विकारही नव्हेत माणसाचे सत्त्व म्हणजे आत्मा होय, अशी ती संकल्पना होती. परंतु ही संकल्पना वैज्ञानिक पद्धतीला मानवणे शक्य नव्हते. कारण ‘आत्मा आहे परंतु तो अवर्णनीय आहे’, अशा संकल्पनेच्या आधारे सूत्रे, नियम, प्रयोग, निरीक्षणे इ. शक्य नाही त्यामुळे फक्त नकारात्मक वर्णनाच्या ह्या व्याख्येवर आधारलेला विचार शास्त्र या पदवीला जाऊ शकत नव्हता परंतु मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र नव्हे असे म्हणताच अध्यात्मवादी विचार आणि तत्त्वज्ञान यांनी मानसशास्त्राला वेगळ्या पंक्तीला बसवले व या सामाजिक प्रक्रियेचा मानसशास्त्राच्या विकासावर सतत दबाव राहिला. [⟶ आत्ममीमांसा].

‘मन’ या संकल्पनेचेही तसेच झाले. मन हे अवर्णनीय नसले तरी ते ‘जणू काही देहातील विशिष्ट स्थान’, ‘जणू एक तरल अस्तित्व’, ‘जणू एक प्रवाह’ अशी रूपकाश्रयी संकल्पना राहिली. ज्या स्पष्टतेवर शास्त्रीय संकल्पना उभी राहते, त्याची इथे उणीव होती. उदा., ‘मनात विचार आला’ हे विधान ‘खोलीत माणूस आला’ अशा स्वरूपाचे प्रत्यंतरक्षम विधान नसून ते ‘समजून घ्यायचे’ विधान ठरते. अशी विधाने अव्याख्येय गृहीतांच्या पातळीच्या पुढे जाऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष कार्यपातळीवर संशोधनाच्या ती उपयोगी पडत नाहीत. अव्याख्येय पद म्हणूनही ⇨ मन ही संज्ञा वापरता आली नाही त्यामुळे मनाऐवजी ‘जाणीव’ किंवा ⇨ बोधावस्था ही संकल्पना वापरायचा प्रयत्न झाला. कारण माणसाला स्वतःला कशाची जाणीव होते आहे याचे अंतर्निरीक्षणपूर्वक निवेदन करता येते. त्यामुळे प्रायोगिक परिस्थितीत एका वेळी फक्त एकाच घटकात फरक करून व त्यामुळे जाणिवेत पडणारे फरक नोंदवून त्यांतील संबंधांची मांडणी करणे शक्य होते. त्यामुळे ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२−१९२०) यापहिल्या मानसशास्त्रीय प्रयोगशाळेच्या संस्थापकाने ‘बोधावस्था’ हीच मानसशास्त्राचा अभ्यासविषय ठरवली. यामधून ⇨ मानसभौतिकीचा (सायकोफिजिक्सचा) पाया घातला गेला.

परंतु लवकरच बोधावस्था आणि अनुभवाचे निवेदन यांतून पद्धतीविषयक प्रश्न निर्माण झाले. कारण अंतर्निरीक्षम हेही शेवटी प्रत्यंतरक्षमतेच्या कसोटीला उतरत नाहीच. ⇨ ई. बी. टिचनर (१८६७–१९२७) यांनी अंतर्निरीक्षण करू शकणाऱ्या. व्यक्तीची प्रौढ, सुसंस्कृत, निरामय अशी वैशिष्ट्ये सांगितली तरी याही वैशिष्ट्यांचे मापन किंवा नेमके व्यक्तिनिरपेक्ष वर्णन करता येत नाहीच. म्हणजे वस्तुनिष्ठ विधानासाठी आवश्यक ती मापनीयता मुळातच मिळेना [⟶ मानसशास्त्रीय पद्धति].

या अडचणी बाजूला सारून पुढे आलेली संकल्पना म्हणजेच वर्तन. कारण वर्तन या संकल्पनेची देहसंबंधित घटनांच्या आधारे व्याख्या करता येते. त्यातील नोंदी व निरीक्षणे स्पष्टतेच्या, नेमकेपणाच्या व वस्तुनिष्ठतेच्या अटी पाळून वर्तनविषयक नोंदी व निरीक्षणे करता येतात. अंतर्निरीक्षण पद्धतीबाबत उपस्थित होणारा अभ्यासव्यक्तीच्या युक्तायुक्ततेचा प्रश्न येत नाही. अगदी प्रतिक्षिप्तक्रियांपासून तो धाडसी कृतीपर्यंत सर्व स्तरांवर जे कोणते बदल होतात, ते अभ्यासून वैज्ञानिक पद्धतीने विचार करणे शक्य असते. रशियन शरीरक्रियावैज्ञानिक ⇨ आय.पी. पाव्हलॉव्ह (१८४९–१९३६) यांनी प्रस्तुत केलेल्या अभिसंधान संकल्पनेने प्रेरित होऊन अमेरिकेत ⇨ जे. बी. वॉटसन (१८७८–१९५८) यांनी वर्तनाचा स्तर हाच मानसशास्त्रीय अभ्यासाचा रास्त विषय आहे, हे ठामपणे मांडले (१९१२) प्रयोगांनी दाखवूनही दिले. वॉटसन यांच्यापूर्वी १९०५ मध्ये मॅक्डूगल यांनीही वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असा विचार मांडला होता.

आत्मा, मन, बोधावस्था आणि वर्तन या संकल्पनांचे परीक्षण व स्वीकार किंवा त्याग वैज्ञानिक संकल्पनावैशिष्ट्यांच्या निकषावर झाला. एकूण शास्त्राचा इतिहास पाहता यातच मानसशास्त्र उशिरा का विकसित झाले, याचे उत्तरही मिळते. एकोणिसाव्या शतकात झालेल्या विज्ञानाच्या प्रगतीत शरीरशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकी यांनी काही मानदंड निर्माण केले होते. मानवी व्यवहारांचा अभ्यास वैज्ञानिक कोटीला नेऊन पोहोचवायचा असेल, तर हे मानदंड पाळायला हवेत या दृष्टीनेच विचार सुरू झाला. विज्ञानाचे मानदंड मानले नाहीत तर मानसशास्त्रास ⇨ रहस्यवादी वा गूढवादी, ⇨ अज्ञेयवादी किंवा ⇨ ईश्वरवादी गोटातच गुंतून पडावे लागेल ही जाणीव निर्माण झाली. वर्तनवादाभोवती उठलेल्या वैचारिक खळबळीचा अर्थ असा लागतो.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 3 years ago) 5 Answer 420 +22